
शेतकऱ्यांनी शितलहरी व धुक्यापासून पिकांचे व फळबागांचे संरक्षण करावे कृषी विभागाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
शेतकऱ्यांनी शितलहरी व धुक्यापासून
पिकांचे व फळबागांचे संरक्षण करावे
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, : केंद्रिय आपत्ती व्यवस्थापन विभाग,नवी दिल्ली यांच्या १९ डिसेंबर २०२२ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात शीतलहर व धुके येण्याचा अंदाज असतो. त्यानुसार यावर्षी सुध्दा जानेवारी महिन्यात शितलहरी व धुके येण्याचे पूर्वानुमान आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांचे खरीप हंगाम संपला असला तरी, रब्बी हंगामातील पिके भाजीपाला व फळबागांचे शीतलहरी व धुक्यापासून संरक्षण करणे महत्वाचे आहे. पिकांच्या संरक्षणाकरिता प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक उपाय करणे आवश्यक आहे.
शितलहरी व धुक्यामुळे पिकांवर काळा तांबेरा, पांढरा तांबेरा व लेट ब्लाबईट इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसान होते. तसेच शीतलहरीमुळे उगवण क्षमता कमी होते. पिकाची वाढ, फुले व फळधारणा कमी होऊन उत्पादनात घट येते. यापासून पिकांचे व फळबागांचे संरक्षण करण्याकरीता फळबागांना बोर्डोपेस्टप लावण्याचे तसेच कॉपर ऑक्सिक्लोराईड, फॉस्फरस व पोटॅशियमची फवारणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिकाच्या मुळाची वाढ चांगली होऊन पिकामध्ये काटकपणा निर्माण होतो. शक्य असेल तेथे वारंवार हलके पाणी द्यावे, जेणेकरून तापमानात एकदम बदल होणार नाही. शक्यतो तुषार सिंचनाचा वापर करून ओलीत करावे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शीतलहरी व धुकेमुळे कमी प्रमाणात बळी पडणारी पिके व वाणाची निवड करावी. फळबागांमध्ये आंतरपीके जसे भाजीपाला, टोमॅटो, वांगी व मोहरीसारखी उंच वाढणारी पिके घ्यावी. भाजीपाला पिकाभोवती तुरीच्या ओळी असल्यास उत्तमप्रकारे वारा प्रतिबंधक म्हणून उपयोगी येऊ शकतात.
शेतकऱ्यांनी पिकांमध्ये किंवा फळबागांमध्ये धुर करून तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. उन्हाळी भाजीपाला व भुईमूग यासारखी पिके शक्यतो मल्चिंग पेपरचा वापर करून लागवड करावी. काही प्रमाणात सेंद्रिय पदार्थांचे (पाला पाचोळा व वनस्पलती अवशेष) आच्छादन करून सुध्दा तापमान नियंत्रित करणे शक्य आहे. केळी किंवा इतर भाजीपाला पिकाचे सभोवती वारा प्रतिबंधक वनस्पती उदाहरणार्थ शेवरी, नेपीअर गवत लागवड करावी.
याप्रमाणे प्रतिबंधात्मवक व उपचारात्मक उपाय करून पूर्वानुमाणित शितलहरी व धुक्यांपासून पिकांचे व फळबागांचे संरक्षण करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,वाशिम यांनी केले आहे.
0 Response to "शेतकऱ्यांनी शितलहरी व धुक्यापासून पिकांचे व फळबागांचे संरक्षण करावे कृषी विभागाचे आवाहन"
Post a Comment