-->

 3 जानेवारी   क्रांतिमा सावित्रीमाई फुले जयंती

3 जानेवारी क्रांतिमा सावित्रीमाई फुले जयंती

 


साप्ताहिक सागर आदित्य 

3 जानेवारी 

क्रांतिमा सावित्रीमाई फुले जयंती


 सावित्रीमाईस त्यांच्या १९४ व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

छोटासा लेख

  

     ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणा  पासून आणि स्वातंत्र्या पासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पराधीन ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला . पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोण असल्याने , स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.

      महाराष्ट्रातील महान समाज सुधारक व बहुजनांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय  समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री – शिक्षण व बहुजन उध्दाराचे  कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले यांचा सातारा जिल्हातील, खंडाळा तालुका असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या  घरी 3 जानेवारी 1831 रोजी  जन्म झाला  . त्यांची ही एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे सावित्री सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली. शिवाय सावित्री धिप्पाड, दणकट असल्याने सावित्रीबाईच्या आई – वडीलांनी मोहीम जोरात सुरु केली.  त्यातून ज्योतिबा तेरा वर्षाचे आणि सावित्रीबाई नऊ वर्षाच्या  असतांना विवाह सोहळा संपन्न झाला. 

        सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते . त्यांनी यशवंत  नावाचा मुलगा आणि त्यांच्या विधवा आईला आपल्या घरी सांभाळले. पुढे सावित्रीबाईंनी ज्योतीबांशी विचार-विनिमय  करून यशवंतला  च दत्तक  घेतले . यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले ही त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष . सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईना मात्र बालवयापासून शिकावे असे मनातून वाटत होते.

         ज्योतिबा  बरोबर सावित्रीबाईंचा  विवाह झाल्यावर त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली होती. ज्योतिबांच्याच मनाने स्त्रियांना शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्रीशिक्षणाला आरंभ  केला होता. ज्योतीबांच्या वडीलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबत विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य .पण ज्योतीबाच्या मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला . त्यामुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासूनच  म्हणजे सावित्रीबाई पासूनच केला. शेतात शेत कामे करतांना  झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या . या मध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेवून पुढचे शिक्षण चालू ठेवले .

      1 जानेवारी 1848  साली ज्योतीबांनी पुण्यात  मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलीना शिकविण्यास धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलींना शिकवू लागल्या . महिलांनी शिकणे हे पाप, आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ लोकं त्याचावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईंनी  या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले  पुणे आणि परिसर  येथील हे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये इंग्रज सरकारने फुले दाम्पत्यांचा  मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केले  . भारतातल्या मुलींना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.

       पण हे सर्व त्या पतीच्या पावलावर पावूल टाकून अंधपणे करीत नव्हत्या , तर त्या कार्यावर त्याची निष्ठा होती , म्हणून ज्योतिबांच्या निर्वाणा  नंतर सुध्दा त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले . सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्यांच्या ठायी असलेल्या  कवि मनाला जे काही आढळले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रुपात शब्दबद्ध  केले. त्यांचे ‘काव्यफुले’  आणि " बावन्नकशी सुबोध रत्नाकर "हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.  ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘ या नावाने पुस्तकही  प्रसिद्ध करण्यात आले . कित्तेक कवितात निसर्गाची मनोरम वर्णनं आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले . त्यांच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत.

       सावित्रीबाईनी  ज्योतीबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा ही त्यांची नितांत श्रध्दा  . सामजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच 1876-- 77  मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असतांना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या  बळी  ठरल्या,  आणि 10 मार्च 1897 मध्ये त्यांच निर्वाण झालं . 

समजातल्या दिन  - दलितांना मायेने जवळ करणाऱ्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडनाऱ्या सावित्रीबाई  फुले    अद्वितीय आहेत.

0 Response to " 3 जानेवारी क्रांतिमा सावित्रीमाई फुले जयंती"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article