
गट विकास अधिकारी यांच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश
साप्ताहिक सागर आदित्य
गट विकास अधिकारी यांच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश
स्वच्छ भारत मिशन आणि आवास योजना
यांना टॉप प्रायोरिटी द्या: वसुमना पंस
ग्रामिण भागातील लोकांचे जिवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नेहमी तत्पर रहा तसेच स्वच्छ भारत मिशन आणि आवास योजना यांना टॉप प्रायोरिटी द्या असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी गट विकास अधिकारी यांना आढावा सभेत दिले.
जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामांचा आढावा (1 ऑगस्ट) घेण्यासाठी सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी यांची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सीईओ वसुमना पंत यांनी बैठकीच्या सुरुवातीला कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नव्यानेच सुरु करण्यात आलेली मोदी आवास योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना दिल्या. घरकुलाच्या कामांत दिरंगाई करणाऱ्या तालुका व ग्राम पंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तीव्र शब्दात समाचार घेतला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कामाचा आढावा घेतला. ओडिएफ प्लस मध्ये जिल्ह्यात प्रगती दिसत असली तरी सार्वजनिक शौचालय आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात विलंब होत असल्याबद्दल सीईओ पंत यांनी नाराजी व्यक्त केली. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची 15 लाखाच्या आतील कामे ज्या गावात सुरु नाही झाली त्या ग्राम पंचायतचे ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी यांची एकाच दिवशी सामुहिक सुनावणी लावण्याचे निर्देश गट विकास अधिकारी यांना दिले. जास्त पाऊस पडल्यामुळे पाण्याचे स्त्रोत दुषित होण्याची शक्यता वाढत असल्याने गटविकास अधिकारी यांनी याकडे लक्ष द्यावे आणि गावातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करावी व प्राप्त निकषानुसार योग्य उपयायोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सध्या स्वच्छ भारत मिशन आणि प्रधानमंत्री आवास योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी गट विकास अधिकारी यांना दिले. बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, मंगरुळपीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरुण मोहोड, नरेगा चे गट विकास अधिकारी रविंद्र सोनोने, सहायक प्रकल्प संचालक सचिन गटलेवार, मानोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बालासाहेब बायस, वाशिम- कारंजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, रिसोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय जाधव, वाशिम पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी गजानन खुळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
0 Response to "गट विकास अधिकारी यांच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश"
Post a Comment