
अखेर पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता; 'या' उमेदवारांना होणार मोठा फायदा
साप्ताहिक सागर आदित्य/
अखेर पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता; 'या' उमेदवारांना होणार मोठा फायदा
मुंबई : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीतील वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील इच्छूक तरुणांच्या पोलीस होण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. राज्य सरकारने पोलीस भरतीच्या कमाल वाढ केली आहे. यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छूक असलेल्या तरुण-तरुणींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत, ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झालीय, अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयामुळे एक संधी मिळणार आहे. २०२१ आणि २१ या वर्षातील रिक्त पदं भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून हे उमेदवार पात्र असतील.
पोलीस भरतीसाठी राज्य सरकार प्रवर्गानुसार कमाल वयाची अट ठरवते. वयाची अट पूर्ण झाल्यानंतर इच्छूक उमेदवार भरतीच्या स्पर्धेतून आपोआप बाहेर होतो. कोरोनामध्ये २ वर्ष सर्वकाही बंद होतं. त्यामुळे शासकीय नोकरभरती आणि पोलीस भरतीही होऊ शकली नाही. तसेच राज्य लोकसेवा आयोगाने याआधीच वयोमर्यादेत वाढ केली होती. त्यामुळे पोलीस शिपाई भरतीसाठीही वयाच्या मर्यादेत वाढ करावी, अशी तरुणांची मागणी होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य केली. त्यामुळे निवडक तरुणांना पोलीस होण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
दरम्यान राज्यात आठवड्याभरात १८ हजार जागांसाठी पोलीस पदभरती करणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ३ नोव्हेंबरला दिली.
0 Response to "अखेर पोलीस भरतीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता; 'या' उमेदवारांना होणार मोठा फायदा"
Post a Comment