लसीकरणात ग्रामीण भाग पिछाडीवर
साप्ताहिक सागर आदित्य
लसीकरणात ग्रामीण भाग पिछाडीवर
मुंबई - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या वर्षपूर्तीनंतरही राज्यातील ग्रामीण भाग लसीकरणात पिछाडीवर आह़े राज्यातील जवळपास २० जिल्ह्यांमध्ये दोन्ही लसमात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ६० टक्क्यांच्या आतच आह़े करोनाची तिसरी लाट वेगाने ग्रामीण भागाकडे सरकत असताना लसीकरण वेगाने पूर्ण होणे आवश्यक सल्याचा पुनरुच्चार तज्ज्ञांनी केला आह़े. राज्यात गेल्या वर्षी १६ जानेवारीला करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झाले तरी १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील विविध आजार असलेल्या रुग्णांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. पहिल्या काही महिन्यांमध्ये लसीकरणाला प्रतिसाद होता, परंतु त्यातुलनेत लससाठा उपलब्ध नव्हता. २१ जून २०२१ पासून खुले लसीकरण धोरण लागू झाले आणि १८ वर्षांवरील सर्वासाठी लसीकरण खुले झाले. ऑगस्टपासून मोठय़ा प्रमाणात साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण वेगाने सुरू झाले. परंतु, दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच ऑक्टोबरपासून लसीकरणाचे प्रमाण कमी झाले. आता ओमायक्रॉन उत्परिवर्तनामुळे तिसरी लाट आल्यानंतर डिसेंबरपासून पुन्हा लसीकरणासाठी प्रतिसाद वाढू लागला. सर्वासाठी लसीकरण खुले केल्यानंतर सहा महिन्यांत राज्यात पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ९० टक्क्यांवर गेले असले तरी दोन्ही मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण ६२ टक्केच आहे. राज्यात दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्यांचे प्रमाण नंदुरबार आणि नांदेडमध्ये सर्वात कमी म्हणजे ४२ टक्के आहे. नाशिक, जालना, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, उस्मानाबाद, यवतमाळ आणि लातूर येथे हे प्रमाण ४५ ते ५० टक्क्यांदरम्यान आहे तर औरंगाबाद, बीड आणि अकोला येथे ४५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
४५ ते ५९ वयोगटातही लसीकरण अपूर्ण
४५ ते ५९ वयोगटातील सुमारे १ कोटी ८० लाख नागरिकांनी लशीची पहिली तर १ कोटी ३७ लाख नागरिकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. त्यातील सुमारे ४३ लाख नागरिकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही़
ग्रामीण भागांत वाढता संसर्ग
ओमायक्रॉनची तिसरी लाट आता हळूहळू ग्रामीण भागांमध्ये सरकत आहे. प्रामुख्याने नाशिक, नागपूर, सातारा, नगर आणि औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. परंतु यातील नाशिकमध्येच ५० टक्के लसीकरम्ण पूर्ण झाले आहे, तर औरंगाबादमध्ये हे प्रमाण सुमारे ४४ टक्के आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागामध्ये रुग्णसंख्या वाढल्यास लसीकरण पूर्ण न झाल्यामुळे धोका वाढेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईमध्ये सुमारे ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे करोनाच्या तिसरी लाट वेगाने फोफावली तरी मृत्यूचे किंवा रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. लसीकरण फायदेशीर असल्याचे मुंबई हे एक उत्तम उदाहरण आहे. आता करोनाचा प्रसार अन्य जिल्ह्यांमध्येही हळूहळू वाढत आहे. त्यामुळे तेथे लसीकरण वेगाने करणे गरजेचे आहे, असे मत करोना कृतीदलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले.
0 Response to "लसीकरणात ग्रामीण भाग पिछाडीवर"
Post a Comment