
कचरामुक्त भारत' ही संकल्पना १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात उपक्रम
साप्ताहिक सागर आदित्य
'स्वच्छता ही सेवा' शुक्रवारपासून!
'कचरामुक्त भारत' ही संकल्पना
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात उपक्रम
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा या अभियानात 'कचरामुक्त भारत' याबाबत विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिली.
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दरवर्षी स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येते. तसेच २ ऑक्टोबर हा 'स्वच्छता दिन' म्हणून साजरा केला जातो. यंदाही केंद्र शासनाने हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम कचरामुक्त भारत ही आहे. यामध्ये दृश्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे.
त्यानुसार सार्वजनिक शौचालये, कचराकुंड्या, कचरा वाहतूक वाहन आदी सर्व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून दुरुस्ती, रंगकाम, साफसफाईचे निर्देश आहेत. याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिल्या.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षी ग्रामीण भागातील बसस्थानके, पर्यटनस्थळे आहेत. ऐतिहासिक वास्तू वारसा स्थळे, नदीकिनारे, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करावयाची आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत.
केंद्रीय मंत्री साधणार ऑनलाइन संवाद
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी ते संवाद कार्यक्रमाद्वारे सरपंच, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी दिली.
0 Response to "कचरामुक्त भारत' ही संकल्पना १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात उपक्रम"
Post a Comment