
पाणी अडवा, भविष्य घडवा! जामदरा घोटीतील शेतकऱ्याचे जलतारासाठी ५०,००० रुपयांचे अनमोल योगदान
साप्ताहिक सागर आदित्य
पाणी अडवा, भविष्य घडवा! जामदरा घोटीतील शेतकऱ्याचे जलतारासाठी ५०,००० रुपयांचे अनमोल योगदान
जामदरा घोटी येथे आज (१ एप्रिल २०२५) जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आणि जलसंधारणाच्या उद्देशाने विशेष सभा आयोजित करण्यात आली. या सभेसाठी उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंडळ अधिकारी देविदास काटकर, तलाठी रामाघरे, कृषी सहाय्यक श्रीमती पत्रे, ग्रामसेवक श्री. चव्हाण आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी गावातील प्रगतशील शेतकरी श्री. वासुदेव सुखदेव म्हस्के यांनी जलसंधारणासाठी पुढाकार घेत एक आगळीवेगळी घोषणा केली. गावातील शेतजमिनीत पाण्याचा साठा वाढावा यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल ५०,००० रुपये योगदान देण्याचा निर्णय घेतला. या निधीतून गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जलतारासाठी शोषखड्डे तयार करण्यात येणार असून, उद्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे.
गावाच्या पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी केलेला हा स्तुत्य उपक्रम गावकऱ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे. या अभूतपूर्व योगदानामुळे उपस्थित अधिकाऱ्यांसह संपूर्ण गाव भारावून गेला. श्री. म्हस्के यांच्या या सामाजिक भानातून उभ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 Response to "पाणी अडवा, भविष्य घडवा! जामदरा घोटीतील शेतकऱ्याचे जलतारासाठी ५०,००० रुपयांचे अनमोल योगदान"
Post a Comment