
दाभडी गावातील पाणीटंचाईवर मात.
साप्ताहिक सागर आदित्य
दाभडी गावातील पाणीटंचाईवर मात.
मंगरूळपीर तालुक्यातील दाभडी या गावांमधील पाणीटंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती. मात्र दाभडी गावातील पाणीटंचाईवर मात केली असल्याची माहिती ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाभडी गावातील पाणी टंचाईबाबत तक्रार प्राप्त होताच कार्यकारी अभियंता वानखडे यांनी तालुक्याचे उपअभियंता यांना बाबत आढावा घेण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, ग्रामपंचायत अधिकारी व पाणीपुरवठा कर्मचारी यांनी गावातील सर्व जलस्त्रोतांची पाहणी केली तेव्हा जलजीवन मिशनच्या विहिरीच्या पाण्याची पातळी अत्यंत खोल गेल्याचे निदर्शनास आले होते. परंतु गावातील इतर ३ विहिरीमधील एकूण अंदाजे 70 हजार लिटर पाणी साठा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. सदर पाणीसाठा गावाकरिता टंचाईच्या कालावधीमध्ये पुरेसा असल्याची माहिती त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे सादर केली. त्याचबरोबर गावातील धरणातील पाण्याच उचल करुन गावातील एका विहिरीमध्ये सोडण्यात येते व सदर पाणी पिण्यासाठी न वापरता ते इतर घरगुती वापरासाठी उपयोगात आणण्यात येते. सध्या स्थितीत गावाची लोकसंख्या 1400 असून पाणीटंचाई कालावधीत पाण्याची आवश्यकता दररोज 20 लिटर प्रति मानसी याप्रमाणे 28 हजार लिटर आहे. आज घडीला गावातील सार्वजनिक स्त्रोतांमध्ये 70 हजार लिटर पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे सद्यस्थितीत लोकसंख्येच्या प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही, भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवल्यास प्रशासनामार्फत आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे यांनी दिली.
0 Response to "दाभडी गावातील पाणीटंचाईवर मात."
Post a Comment