
लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी
साप्ताहिक सागर आदित्य
लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी
प्रलंबित ऑनलाईन सेवा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात : रामबाबू नरूकुल्ला
वाशिम, दि. 13 मार्च:
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे तात्काळ ऑनलाईन सेवा मिळण्यासाठी यंत्रणांनी काम करावे, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोग अमरावती विभागाचे आयुक्त रामबाबू नरूकुल्ला यांनी दिले.
दि. 12 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात जिल्ह्यात लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अमलबजावणीबाबत आयोजित आढावा सभेत श्री. नरूकुल्ला बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विभागीय आयुक्त नरुकुल्ला म्हणाले, या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणांनी दक्ष राहून तपासणी अहवाल दरमहा नियमित जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा. आपण लोकांचे सेवक आहोत त्यामुळे आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. ज्या विभागाच्या योजनांचा संबंध नागरिकांशी येतो, त्यांना चांगल्याप्रकारे ऑनलाइन सेवांचा लाभमिळाला पाहिजे. ऑनलाइन सेवांबाबत नागरिकांना पूर्ण माहिती नाही. त्यामुळे संबंधित विभागांनी विविध माध्यमातून लोकांना योजनांची माहिती देऊन ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्याबाबत
कळवावे, असे ते म्हणाले.
चांगल्याप्रकारे ऑनलाईन सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निश्चितच सन्मान करण्यात येईल, असे सांगून नरूकुल्ला
म्हणाले, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सेवा देण्यात याव्यात. नागरिकांना चांगल्या सेवा देण्याची जबाबदारी आपली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीईओ वैभव वाघमारे म्हणाले, लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत ज्या सेवा-सुविधा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत, त्या सेवा नागरिकांना वेळेत मिळाल्या पाहिजे यासाठी यंत्रणांनी प्रयत्नशील असावे, ज्या विभागाच्या सेवा सुविधा कमी आहेत त्या त्वरित ऑनलाइन करण्यात याव्यात. असेही ते यावेळी म्हणाले.
-------
जिल्हा परिषद इमारतीच्या बोलक्या भिंती पाहून राज्यसेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त रामबाबू नरुकुल्ला यांनी सीईओ वैभव वाघमारे यांचे कौतुक केले. जिल्हा परिषदेच्या परिसरात असलेली झाडे, कचराकुंड्यांची व्यवस्था आणि लोकांना बसण्यासाठी करण्यात आलेल्या बाकड्यांची सुविधा यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासन हे लोकाभिमुख असल्याची पावतीच त्यांनी दिली.
--------
सभेला सर्व विभाग प्रमुख आणि सर्व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
-------
0 Response to "लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी "
Post a Comment