-->

सर्व विभागांनी किन्हीराजा या दत्तकगावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध रहावे

सर्व विभागांनी किन्हीराजा या दत्तकगावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध रहावे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

सर्व विभागांनी किन्हीराजा या दत्तकगावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध रहावे


— जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


मनरेगा अंतर्गत दत्तकग्राम किन्हीराजा येथे जिल्हाधिकाऱ्यांची व्यापक शिवार फेरी


वाशिम,दि.१ जानेवारी  मनरेगा अंतर्गत किन्हीराजा दत्तकगावामध्ये केवळ रोजगारनिर्मिती नव्हे, तर जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटन विकास यांचा समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. गावातील तलाव, जंगल क्षेत्र, अभयारण्य परिसर आणि समृद्धी महामार्गालगतची भौगोलिक क्षमता लक्षात घेता येथे शाश्वत विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करून संपूर्ण गावाचा नियोजनबद्ध व दीर्घकालीन विकास आराखडा तयार करावा, जेणेकरून किन्हीराजा हे आदर्श दत्तकगाव म्हणून विकसित होईल.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.


 जिल्ह्यातील विकसित किन्हीराजा दत्तकगाव प्रकल्पाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रस्तावित विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी किन्हीराजा परिसरात सविस्तर शिवार फेरी केली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.


या शिवार फेरीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, भाप्रसे परिविक्षाधीन अधिकारी तथा गटविकास अधिकारी आकाश वर्मा, तहसीलदार दीपक पुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे,सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश कंकाळ, महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते


या फेरीत ग्रामविकासासोबतच पर्यटन, पर्यावरण संवर्धन व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या संकल्पनांवर भर देण्यात आला.जिल्हाधिकाऱ्यांनी फेरीदरम्यान मोठा तलाव, पौराणिक महत्त्व असलेला छोटा तलाव, डॉ. सलीम अली कॅम्प – काटे पूर्णा अभयारण्य, सोनल धरण परिसरातील ई-क्लास जमीन तसेच काटेपूर्णा इंटरचेंज – समृद्धी महामार्ग आदी ठिकाणांची पाहणी केली. या ठिकाणी उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत व नियोजनबद्ध वापर कसा करता येईल, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.


पर्यटन विकासाच्या दृष्टीने जंगल सफारी, फळबाग लागवड, रेशीम उद्योग विकास, शेततळे निर्मिती, रोपवे, बांबुवन विकास, तलावांचे सौंदर्यीकरण, तसेच समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी माहिती फलक व दिशादर्शक सुविधा उभारण्याबाबत विविध संकल्पना मांडण्यात आल्या. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


किन्हीराजा गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी एकात्मिक व दूरदृष्टीपूर्ण नियोजन आवश्यक असून, त्यासाठी संपूर्ण गावाचा विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादनही जिल्हाधिकारी  कुंभेजकर यांनी केले. या अनुषंगाने सर्व विभागांनी समन्वयाने काम करून संपूर्ण नियोजनाचा प्रारूप आराखडा लवकरात लवकर तयार करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.


मनरेगा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांमुळे जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, पर्यटन विकास व रोजगारनिर्मिती या सर्व बाबी एकाच वेळी साध्य होतील, तसेच विकसित किन्हीराजा हे दत्तकगाव प्रकल्पातील आदर्श गाव म्हणून उभे राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0 Response to "सर्व विभागांनी किन्हीराजा या दत्तकगावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध रहावे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article