
वाशिम जिल्ह्यात जलतारा कामांना गती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमदान आणि जनजागृती
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यात जलतारा कामांना गती
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमदान आणि जनजागृती
वाशिम: दि.१२ मार्च (जिल्हा माहिती कार्यालय) जिल्ह्यात जलतारा प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापनाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. या कामांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध गावांमध्ये श्रमदान आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
वाशिम तालुक्याच्या भटउमरा गावात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते आज जलतारा प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांचे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतः श्रमदान करून गावकऱ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी गावकऱ्यांनी दोन हजार जलतारा शोषखड्डे घेण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला सरपंच गोदावरी काळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. हरीश बाहेती, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, तहसीलदार निलेश पळसकर, गटविकास अधिकारी रवींद्र सोनवणे, हभप श्रीकृष्ण महाराज राऊत, पाणी फाउंडेशनचे सुभाष नानोटे आणि अविनाश मारशेटवार यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, "जलतारा प्रकल्प हा केवळ शासकीय उपक्रम नसून, लोकसहभागातून राबवलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे पाण्याची बचत होईल आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. प्रत्येक गावकऱ्याने या प्रकल्पात सक्रिय सहभाग घ्यावा."
आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. हरीश बाहेती यांनी जलतारा प्रकल्पाचे महत्त्व विशद करताना सांगितले, "या प्रकल्पामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल, ज्यामुळे पाण्याची कमतरता दूर होईल."
१२ गावांमध्ये श्रमदान आणि जनजागृती मोहीम
आसोला, वाघजाळी, कामठवाडा, कोंडाळा, सुराळा, तोरनाळा, सावंगा, पांडवउमरा, माळेगाव, ब्राम्हणवाडा, चिखली सुर्वे आणि भटउमरा या १२ गावांमध्ये जलतारा प्रकल्पांतर्गत श्रमदान आणि जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. "पाणी अडवा, पाणी जिरवा" आणि "प्रत्येक एकराला एक जलतारा" या संकल्पनांवर आधारित कामे सुरू आहेत.
उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी गावकऱ्यांना संबोधित करताना सांगितले, "जलतारा प्रकल्प हा आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरातील पाण्याची समस्या दूर करू शकतो. या प्रकल्पात अधिकाधिक गावकऱ्यांनी सहभागी व्हावे आणि आपल्या परिसराला समृद्ध करावे."
दुष्काळात या १२ गावांतून पाणी दिंडी काढल्यास पाऊस पडतो, या अनुभवामुळे या परिसराला कायमस्वरूपी पाणीदार बनवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. "पाणी दिंडी आनंदी दिंडीत परावर्तित व्हावी, १२ गावांचा परिसर प्रति एकर एक प्रमाणे जलतारा या कामाने पाणीदार व्हावा, शेतकरी व शेतमजूर आनंदी व्हावा" या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
0 Response to "वाशिम जिल्ह्यात जलतारा कामांना गती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमदान आणि जनजागृती"
Post a Comment