
नवसाक्षरता सर्वेक्षण शिक्षकांकडे देऊ नये ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची मागणी
साप्ताहिक सागर आदित्य
नवसाक्षरता सर्वेक्षण शिक्षकांकडे देऊ नये
ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची मागणी
वाशीम: नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षणामधून अशैक्षणिक काम म्हणून शिक्षकांना वगळण्यात यावे, अशी मागणी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे वाशीम जिल्हाध्यक्ष संभाजी साळसुंदर यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे साकडे घालण्यात आले.
शिक्षकांना निरक्षर सर्वेक्षणाचे काम देण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून आदेशित केले आहे. निरक्षर सर्वेक्षण हे अशैक्षणिक काम असून, वेळकाढू असल्याने शिक्षकांचा शैक्षणिक व अतिरिक्त वेळ खर्ची होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी होण्याची
दाट शक्यता आहे. तसेच क्रमिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी असलेले तास नक्कीच कमी पडतील. आधीच शिक्षकांना ऑनलाइन कामे, दीड महिन्यात चार चाचण्या घेणे, रोजचे अहवाल देणे, पेपर तपासणी व निकाल तयार करणे, शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी मदत करणे, तसेच इतर भाराभर कामे करावी लागतात. त्यामुळे या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना वगळून दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघाचे महा सचिव गजानन उगले,संपर्क प्रमुख नवनाथ मुसळे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य पांडुरंग साळसुंदर यांची उपस्थिती होती.
0 Response to "नवसाक्षरता सर्वेक्षण शिक्षकांकडे देऊ नये ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाची मागणी"
Post a Comment