ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात,
साप्ताहिक सागर आदित्य
सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक #पाणीपुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित ग्रामीण #पेयजल धोरण बैठकीत दिले. तसेच याकरिता विभागाने सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचनाही दिल्या.
बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील. राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.
पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, संपूर्ण योजनेसाठी लागणाऱ्या एकूण वीज युनिटची संख्या आदी लक्षात घेऊन महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचे धोरण तयार करावे. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये, याची काळजी घ्यावी. केंद्र सरकारच्या निकषानुसार दरडोई दरदिवशी ५५ लिटर पाणी पुरविले पाहिजे, यानुसार योजना पूर्णत्वास न्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
सर्व ग्रामीण, प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी तालुका स्तरावर युनिटची स्थापना करण्यात यावी. या युनिटमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग घेण्यात यावा. पाणीपट्टीच्या वसुलीतून योजनेच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यात यावा. ज्या ठिकाणी पाणी कराची कमी वसुली असेल, अशा ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीमधून रक्कम उपलब्ध करून देण्यात यावी. अशा युनिटच्या माध्यमातून देखभाल दुरुस्तीची किंमतही कमी येईल आणि योजनाही बंद पडणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी सांगितले.
#WaterPolicy
#RuralDrinkingWater
0 Response to "ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात,"
Post a Comment