
जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन. जिल्हा परिषदेमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन.
जिल्हा परिषदेमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन.
जिल्हा परिषदेत नोकरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील गोर-गरीब लोकांची सेवा करण्याची संधी मिळते. त्यामुळे जिल्हा परिषदेत नोकरी करणाऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आनंद द्यावा आनंद घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अधिकारी- कर्मचाऱ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांना संबोधित केले. यावेळी आ. किरण सरनाईक, आ. श्याम खोडे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपवन संरक्षक अभिजीत वायकोस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरखडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले वैयक्तिक ताण- तणाव आणि दुःखाला विसरून कर्मचाऱ्यांनी आनंदाने आपले कर्तव्य बजावले पाहिजे. माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले "चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कधीकधी त्रास सहन करावा लागतो पण लक्षात घ्या, ज्या झाडाला फळे आहेत त्याच झाडाला लोक दगडं मारतात. याची तमा न बाळगता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जीव ओतून काम करावे आणि कार्यालयात येणाऱ्या माणसाला समाधान वाटेल असे आपले वर्तन ठेवावे. आपल्या वागण्या बोलण्यातून एखाद्याचं मन दुखेल, त्याची झोपमोड होईल असे काम करू नये” असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
-----
जिल्हा परिषदेच्या बोलक्या भिंतींचे उद्घाटन:
वाशिम जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांच्या भिंती बोलक्या केल्यानंतर आता जिल्हा परिषद इमारतीची रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या बोलक्या भिंतीचे फित कापूनउद्घाटन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागाच्या जनजागृती विषयक माहिती फलकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
------
पालकमंत्री भरणे यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांच्या कार्याचे कौतुक केले. "एखादा अधिकारी प्रामाणिकपणे काम करून जिल्ह्याचा कसा कायापालट करू शकतो याचे उत्तर उत्तम उदाहरण म्हणजे वाशिम जिल्हा परिषदेचे सीईओ आहेत" असे ते म्हणाले.
-----------
पालकमंत्री श्री. भरणे यांनी जिल्हा परिषद शाळेबद्दल ही गौरवोद्गार काढले. ते म्हणाले कि जिल्हा परिषदेत ग्रामिण भागातील गोरगरीबांची मुले शिकतात. अशा मुलांना घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असुन ती त्यांनी पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारला असुन पटसंख्येतही वाढ होत आहे, याचे श्रेय त्यांनी शिक्षकांना दिले.
-------------------
"पुणे जिल्हा परिषद सदस्य ते अध्यक्ष असा प्रवास करून मी जरी मंत्री झालो असलो तरी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ग्रामीण भागातील लोकांची सेवा करण्याची जी संधी मिळाली त्याने मी खूप समाधानी आहे."आपण आमदार झालो मंत्री झालो याचे श्रेय सुद्धा त्यांनी जिल्हा परिषदेलाच दिले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्याकडे निर्देश करत पालकमंत्री म्हणाले "खेड्यातल्या माणसाला सर्वाधिक मदत जर कोणी करत असेल तर ते म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष." याचा आपण स्वतः अनुभव घेतल्याचे त्यांनी सांगितले.
------------------
आमदार श्याम खोडे यांनी सुद्धा यावेळी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळविलेल्या ग्राम पंचायत अधिकारी अरविंद पडघन, संजय नवघरे आणि सत्वशिला जाधव यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन उप शिक्षण अधिकारी गजानन डाबेराव आणि नेहा काळे यांनी केले. शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारी यांनी आपल्या प्रास्ताविकातून जिल्हा परिषदेची यशोगाथा सादर केली.
--------
0 Response to "जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन. जिल्हा परिषदेमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन"
Post a Comment