तुषार कॉलनीतील अतिक्रमण व नाली बांधकामाचा प्रश्न थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे
साप्ताहिक सागर आदित्य
तुषार कॉलनीतील अतिक्रमण व नाली बांधकामाचा प्रश्न थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे
कारंजा (लाड)
येथील तुषार कॉलनी परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण व नाली बांधकामाबाबत कारंजा नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर नागरिकांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे सोमवारी (दि. 2) निवेदन सादर केले आहे.
तुषार कॉलनीत रस्ता व नाली बांधकाम करताना अतिक्रमण न काढता काम सुरू करण्यात आले. त्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली असून नाल्यांचे पाणी घरासमोर साचत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या संदर्भात कारंजा नगरपालिकेकडे लेखी तक्रारी, निवेदने तसेच सूचना देण्यात आल्या. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण हटविण्याऐवजी सदोष पद्धतीने नाली बांधकाम सुरू ठेवल्याने परिस्थिती अधिकच बिघडली आहे.
नगरपालिकेकडून न्याय न मिळाल्याने नागरिकांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे निवेदन देत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे. नियमानुसार रस्ता व नाली बांधकाम करावे, तसेच संबंधित जबाबदारांवर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रशासनाने याप्रकरणी तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही तुषार कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे.
0 Response to "तुषार कॉलनीतील अतिक्रमण व नाली बांधकामाचा प्रश्न थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे"
Post a Comment