मान्सूनपूर्व तयारीला गती देत यंत्रणांनी १५ मे पूर्वी कामे पूर्ण करावीत
साप्ताहिक सागर आदित्य
मान्सूनपूर्व तयारीला गती देत यंत्रणांनी १५ मे पूर्वी कामे पूर्ण करावीत
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा सभा
वाशिम,दि.५ मे मान्सूनपूर्व तयारीला गती देत सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोर नियोजनाने काम करावे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात मान्सूनपूर्व आढावा सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक लता फड, वाशिम तहसीलदार निलेश पळसकर,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी जिल्ह्यात संभाव्य पूरस्थिती, अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. पाटबंधारे व जलसंधारण विभागाने तातडीने ॲक्शन प्लॅन तयार करावा, तसेच प्रकल्पस्थळी आवश्यक खबरदारी घेऊन बॅरिकेटिंग करावे, असे स्पष्ट निर्देश दिले.
आपत्ती व्यवस्थापनासाठी वितरित करण्यात आलेले साहित्य सुस्थितीत आहे की नाही याची खातरजमा करून त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (ड्रिल) घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. बाहेरून येणाऱ्या नद्यांच्या पाण्यामुळे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क अधिकारी नेमून त्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेत सादर करावी, असेही त्यांनी सांगितले.
जलसंधारण विभागाने जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित झालेल्या तलावांची सविस्तर माहिती सादर करावी, तसेच वायरलेस सुविधा तात्काळ सुरू करून आपत्ती काळात संदेशवहनासाठी ती कार्यान्वित ठेवावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.परिवहन विभागाने जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले. नालेसफाईची कामे तातडीने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, ड्रेनेज व्यवस्था सक्षम ठेवावी, पूरप्रवण भागांची ओळख करून आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, तसेच धरणे व तलाव पातळीवर सतत निरीक्षण ठेवावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
आरोग्य विभागाने साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी पुरेसा औषधसाठा, फॉगिंग मोहीम, स्वच्छता व जनजागृती कार्यक्रम राबवावेत. आपत्कालीन रुग्णसेवा अखंडित राहण्यासाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत,
वीज वितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून सेवा अखंडित ठेवावी, तर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत स्वयंसेवी संस्थांचे चांगले सहकार्य आजपर्यंत मिळाले असून पुढेही असे सहकार्य मिळावे.अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
0 Response to "मान्सूनपूर्व तयारीला गती देत यंत्रणांनी १५ मे पूर्वी कामे पूर्ण करावीत "
Post a Comment